शनिवार, २० जून, २०१५

विश्वव्यापी योगामृत : आंतरराष्ट्रीय योगदिन, त्यानिमित्त..

   विश्वव्यापी योगामृत : आंतरराष्ट्रीय योगदिन, त्यानिमित्त..

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर योग दिन साजरा व्हावा म्हणून संयुक्त राष्ट्र संघाकडे आग्रह धरून, योगाचे महत्त्व आणि माहात्म्य पटवून देऊन अखेर संपूर्ण विश्वाला योगामृताची देणगी तमाम भारतवासियांतर्फे वरदान म्हणून दिली. संयुक्त राष्ट्रसंघानेही मानवी आरोग्याशी निगडित असलेल्या योगाला अखेर एक दिवस दिला. आंतरराष्ट्रीय स्तरावर 21 जून हा योग दिन ठरविण्यात आला. भारतीय  संस्कृतीला ऋषिमुनींची मोठी परंपरा आहे. योगाच्या बाबतीत तर याची जन्मभूमी म्हणून भारताकडे पाहिले जाते. या योग दिनी भारतासह संपूर्ण जगभरातील शाळा-महाविद्यालातून योगाचे महत्त्व, उपक्रम व प्रत्यक्षिकातून सांगण्यात येणार आहे.
जगभरातील अखिल मानवजातीच्या निरोगी शरीरासाठी, संस्कारक्षम व संतुलित मनासाठी आणि सुखी व समृद्ध जीवन जगण्यासाठी भारताने अखिल विश्वाला दिलेली ही अमृतमय पर्वणीच म्हणावी लागेल. 

सुख-दु:खामध्ये मनाचा समतोल राखणे म्हणजे योग किंवा आपल्या कर्माबद्दलची, कार्याची कुशलता म्हणजेच योग. थोडक्यात योग म्हणजे शरीर, मन आणि बुद्धी यांना एकत्रित व संतुलितपणे राखण्याचे साधन व तंत्र म्हणजे योग. योगाचा मूळ उद्देश केवळ रोग किंवा आजार बरे करणे हा नसून ते होऊ नयेत म्हणून काळजी घेणे हाच आहे. हा संपूर्ण योग शंभर टक्के विज्ञानावर आधारलेला आहे. योगापाठीमागे फार  मोठे विज्ञान आहे. हे आपल्याला प्रात्यक्षिकातून व पूर्वजांच्या दाखल्यातून अभ्यासता येईल. हजारो वर्षाची परंपरा या योगाभ्यासाला आहे. बाराव्या शतकातील संत ज्ञानेश्वरांचे उदाहरण जरी आपण घेतले तरी आपल्याला हे लक्षात येतं की याच योगातील काही आसनांच्या व साधनेच्या जोरावर ज्ञानदेवांनी आपल्या शरीरामध्ये उष्णता निर्माण केली होती, तेव्हा मुक्ताईने ज्ञानेश्वरांच्या पाठीवर मांडे भाजले होते. असे आपण ऐकतो, वाचतो यामध्ये कोणतीही दैवी शक्ती नसून केवळ विज्ञान आहे. योगाच्या साधनेवरून मानवाला आपल शरीरामध्ये उष्णता निर्माण करता येते व निर्माण केलेली उष्णता कमी किंवा नियंत्रित करता येते. ऋतुमानानुसार हे मानवाला लाभदायक ठरते. उन्हाळ्यात   उष्णतेची दाहकता कमी व्हावी म्हणून शीतली प्राणायम करून शरीरात थंडावा निर्माण करता येतो तर हिवाळ्यामध्ये थंडीपासून बचाव व्हावा म्हणून भस्त्रिका प्राणायम करून शरीरात त्वरित उष्णता निर्माण करता येते. अगदीच अलीकडील स्वातंत्र्यप्राप्तीनंतरच्या काळात आपण इंग्रजांचे कायदे जसेच तसे घेतले. ते राबवत गेलो. त्यातील काही त्रुटी या योगाभ्यासाने निदर्शनास आल्या. त्यामध्ये असे वाचनात येते की एका आरोपीने योगातील दीर्घश्वासांचा सराव करून श्वासावर काही मिनिटांसाठी नियंत्रण मिळवले होते. त्याला फाशीची शिक्षा झाली होती. त्याच्या कर्माचे फळ त्याला मिळाले होते. कायद्यानुसार निर्धारित वेळेत त्याला फासावर लटकविले गेले. निर्धारित वेळ संपली की त्याल फासावरून उतरवले गेले तरी देखील तो जिवंत होता. आता धकाधकीचे जीवनमान, प्रदूषण, व्यायामाचा अभाव, असमाधानी वृत्ती, मन:शांतीचा अभाव यासारख्या अनेक कारणांनी ते घटत चालले आहे. केवळ औषध गोळ्यांच्या तात्पुरत्या आधारावर आपण फक्त जिवंत राहात चाललो आहोत. शुद्ध आणि दीर्घ हवा घेतली तर आपल्याला औषधे खावी लागणार नाही. हे योगातील विज्ञान आपण समजून घेतले पाहिजे.
 
 आज जन्मताना आणि मरतानाही माणसाला आय.सी.यू (कृत्रिम श्वासावर) ठेवावे लागते आहे. ही आजच्या माणसाच्या आरोग्याची शोकांतिका आहे. पूर्वी माणूस घरी जन्मायचा आणि घरीच मरायचा परंतु आज तसं राहिलं नाही. जन्मही दवाखान्यात आणि मृत्यूही  दवाखान्यात, अशी परिस्थिती होऊन बसली आहे. या सर्व व्याधींवर, समस्यांवर योगासने, प्राणायम, धनधारणा, मन:शांती, विपश्यना हेच रामबाण उपाय उरलेले आहेत. अगदी प्राचीन काळी देखील गौतम बुद्धांनी आपल्या जीवनशैलीत, तर अलीकडील स्वामी विवेकानंदांनी देखील हेच मार्ग अवलंबिले होते. यावरून तरी आपण या योगामृताचे महत्त्व जाणायला हवे आहे.
योग हा विश्वातील कोण्या एका जाती-धर्मासाठी नसून तो सर्वासाठी आहे. याला फक्त एकच जात माहिती आहे ती म्हणजे मानव-जात. मग इथे मानव जातीतील लिंगभेदाला देखील थारा नाही. 
 
काही राजकीय मंडळी आपली मतांची पोळी भाजून घेण्यासाठी धार्मिकतेचा रंग देऊ पाहात आहेत. सूर्यनमस्कारावरून राजकीय राळ उठविली जात आहे. सूर्य काही कोण एका विशिष्ट धर्मासाठी नाही. अगदी इस्लाम धर्मामध्ये नमाज पठण्यासाठी बसण्याची जी पध्दत आहे ती याच योगशास्त्रातील वज्रासनावर आधारित आहे. आणि वज्रासनाचे मानवीयं आरोग्याला काय फायदे आहेत ते सर्वच धर्मियांना माहीत आहेत. त्यामुळे अखिल मानवीय जातीला आता योगाचे महत्त्व कळून चुकले आहे. म्हणून योगामृताने अवघे विश्व व्यापून टाकले आहे. 
हरिश्चंद्र खेंदाड

बुधवार, २७ मे, २०१५

स्वातंत्र्यवीर सावरकर

https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiBKsY4w42Y6WyW0ZYxWfvDgquCQ9Jvv09RULygFjIO0erfq6wXZ31crmnoMJwbIcAXjOF5oHWQ4zjeQ_cBgBneQ_AUb6GWTZk0CQKABsGyHjPvPrYvdt87uqxzj2TjTqPaV2nNoJNYMSe_/s1600/savarkar_3.jpg
वि. दा. सावरकर


 स्वातंत्र्यसैनिकांचे अग्रणी, हिंदू राष्ट्रवादाचे तत्त्वज्ञ व हिंदू संघटक, धर्मसुधारक व समाजसुधारक, महाकवी आणि विज्ञाननिष्ठा व राष्ट्राची शस्त्रसज्जता यांबाबत प्रखर विचार मांडणारे वि. दा. सावरकर यांची आज जयंती. त्या निमित्त..

महाराष्ट्रात नाशिकजवळच्या भगूर गावी विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला. तीव्र बुद्धिमत्ता, आक्रमी व साहसी वृत्ती, हृदयातील मानव्य अन् सर्जनशील कवित्व लाभलेले हे बालक वयाच्या 10 व्या वर्षीच इतिहास आणि धर्मशास्त्रावरील जाडजूड पुस्तके वाचू लागले. 10 व्या वर्षी विनायकाने केलेल्या कविता तत्कालीन अग्रणी मराठी वृत्तपत्रात छापून येत असत. मात्र कवीच्या वयावर वाचकांचा विश्वासच बसत नसे. सावरकरांच्या घरची आर्थिक परिस्थिती उत्तम होती. पारतंर्त्य, गुलामी, ब्रिटिश राजवट यांचा थोडाही उपद्रव सावरकरांपर्यंत पोहचला नव्हता. पण..इतिहासाची पाने वाचत असताना सावरकरांच्या मनात राष्ट्रवाद आकार घेत होता. उन्मत्त ब्रिटिश सत्तेशी झगडणार्‍या क्रांतिकारकांनी सांडलेले रक्त सावरकरांना अस्वस्थ करू लागले. त्याच काळात रँडचा वध करून फासावर चढलेल्या चापेकर बंधूंच्या बलिदानाने सावरकरांवर फार मोठा आघात झाला. त्याच रात्री देशभक्तीने तळमळलेल्या त्या 16 वर्षाच्या तरुणाने आपल्या कुलदेवतेसमोर शपथ घेतली - ‘देशाच्या स्वातंत्र्र्यासाठी शत्रूस मारिता-मारिता मरेतो झुंजेन.. जर यशस्वी झालो, तर माझ्या मातृभूमीला स्वातंर्त्याचा अभिषेक घालेन आणि हरलो तर माझ्या रक्ताचा अभिषेक तिच्या चरणांवर घडेल.’

पुढचा तरुण सावरकरांचा जीवनपट चित्तथरारक प्रसंगांनी भरलेला आहे. अभिनव भारत व मित्रमेळा या गुप्त क्रांतिकारी संघटनांची स्थापना त्यांनी केली. पुण्यामध्ये विदेशी कापडाची होळी केली (1905). उच्च शिक्षणाच्या निमित्ताने ते लंडनमध्ये दाखल झाले. त्याठिकाणी असलेल्या ‘इंडिया हाउस’मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले. मदनलाल ¨धग्रा हा सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य! मदनलालने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकार्‍याचा वध करून, हसत-हसत फाशी स्वीकारली. त्याच काळात त्यांनी इतर देशांमधील क्रांतिकारक गटांशी संपर्क करून त्यांच्याकडून बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. ते बॉम्बचे तंत्रज्ञान व 22 ब्राऊनिंग पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकीच एका पिस्तुलाने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याचा वध अनंत कान्हेरे या 16 वर्षाच्या युवकाने केला. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या अभिनव भारतच्या 3 सदस्यांना फाशी झाली. कलेक्टर जॅक्सनचे जनतेवरील अन्याय वाढत होते, तसेच तो बाबाराव सावरकर (स्वातंर्त्यवीरांचे बंधू) यांच्या तुरुंगवासाला कारणीभूत ठरला होता.

सावरकरांनी आपल्या सळसळत्या व्यक्तिमत्त्वाने व ओघवत्या वक्तृत्वाने इंग्लंड आणि भारतातल्या क्रांतिकारकांना झपाटून टाकले. ब्रिटिश सरकारला याचा सुगावा लागताच त्यांनी सावरकरांना तत्काळ अटक केली. समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात असताना सावरकरांनी फ्रान्सच्या मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून उडी मारली.(1910) ब्रिटिशांच्या कैदेतून सुटून त्यांनी पोहत फ्रान्सचा समुद्रकिनारा गाठला. पण किनार्‍यावरील फ्रेंच रक्षकांना भाषेच्या समस्येमुळे सावरकरांचे म्हणणे कळले नाही, आणि ब्रिटिश सैनिकांनी त्यांना बेकायदेशीरपणे अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरण्यात आला. त्यांना दोन जन्मठेपांची-काळ्या पाण्याची-शिक्षा (सुमारे 50 वर्षे अंदमानच्या तुरुंगात) ठोठावण्यात आली(1911). मॉर्सेलिस येथे उडी मारताना सावरकरांनी सखोल विचार केला होता. दोन देशांतील कैदी हस्तांतरण किंवा अन्य तत्सम करारांचा मुद्दा त्यांच्या मनात होता. फ्रान्सच्या भूमीवरून (त्या शासनाच्या परवानगीशिवाय) ब्रिटिश पोलीस त्यांना पकडू शकणार नाहीत असा त्यांचा अंदाज होता. पण भारताच्या दुर्दैवाने तसे घडले नाही.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचा तेजोभंग करण्यासाठी ब्रिटिश सरकारने त्यांना अंदमानच्या काळकोठडीत ठेवले. हरप्रकारे छळले. खडय़ा बेडीत टांगले. तेलाच्या घाण्याला जुंपले. नारळाचा काथ्या कुटण्याचे कष्टप्रद काम दिले. अंदमानातल्या त्या अंधार्‍या खोलीत हा तेजस्वी बॅरिस्टर किडे पडलेले अन्न खात होता आणि मचूळ पाण्याने तहान भागवत होता. या मरणप्राय वेदना सहन करीत असतानाही त्यांच्या डोळ्यासमोर एकच ध्येय होते, मातृभूचे स्वातंर्त्य! तब्बल 11 वर्षे हा छळ सहन करत असतानाही सावरकरांचे सर्जनशील कवित्व आणि बंडखोर क्रांतिकारकत्व तसूभरही कमी झाले नव्हते.
बाभळीच्या काटय़ांनी त्यांनी तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.अंदमानच्या काळकोठडीत सावरकरांना हिंदुस्थानचे बदलते राजकारण दिसत होते. ब्रिटिशांची बदललेली नीती, मुस्लिम लीगचा वाढता मुजोरपणा सावरकरांना अस्वस्थ करत होता. आज ब्रिटिश हे मुख्य शत्रू राहिलेले नाहीत. ते कधीतरी हा देश सोडून जाणारच आहेत. पण पुढे हिंदू संघटन करणे आवश्यक आहे हे सावरकरांनी ओळखले. विठ्ठलभाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारख्या नेत्यांच्या प्रयत्नांमुळे व खुद्द सावरकरांनी मुत्सद्दीपणाने ब्रिटिश सरकारची काही बंधने मान्य केल्यामुळे त्यांची अंदमानातून सुटका झाली.

जीवनाच्या या दुसर्‍या पर्वात समाजसुधारक, हिंदू संघटक, भाषाशुद्धी चळवळ चालवणारे व श्रेष्ठ साहित्यिक, समाजात प्रेरणा निर्माण करणारे वक्ते, विज्ञाननिष्ठेचा प्रचार करणारे आणि हिंदू धर्म आधुनिक स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न करणारे तत्त्वज्ञ व विचारवंत अशा अनेक स्वरूपांत सावरकर समाजासमोर आलेले दिसतात. अंदमानातून सुटल्यानंतर तंना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानबद्ध केले.
हिंदू समाज संघटित करण्यासाठी सावरकरांनी जे काम रत्नागिरीत केले, ते अतुलनीय आहे. हिंदू समाजाच्या अध:पतनाला जातिव्यवस्था, चातुर्वण्र्य आणि हिंदूंचा धर्मभोळेपणाच जबाबदार आहेत, हे सावरकरांनी ओळखले. सावरकरांनी असंख्य मंदिरे दलितांना उघडी करून दिली. रत्नागिरी येथे त्यांनी पतितपावन मंदिर स्थापन केले, या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश दिला.
सुमारे 60 वर्षे ‘स्वातंत्र्यवीरांनी’ स्वातंत्र्य व सुराज्य यांसाठी अथक परिश्रम घेतले. 1966 मध्ये वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी प्रायोपवेशनाचा निर्णय घेतला. अन्नत्याग केल्यानंतर 22 व्या दिवशी त्यांचे प्राण पंचतत्त्वात विलीन झाले. 

गुरुवार, १४ मे, २०१५

शंभू राजे

 शंभू  राजे
शिव रुपाने महाराष्ट्राचा सूर्य उगवला
पराक्रमे तयाच्या महाराष्ट्र दारी भगवा फडकला !!
बापाने घडवल्या मुलुखाला पुढे रेटाया आज युवराज धड़कला
सिंहाच्या छाव्याला  जन्मी घालुनी ,सईने पुरंदरी शंभू जोडीला !!
माथी संकट नसे , तो कोण भोसला
सिद्ध करावया शंभू लहापणीच संकटाशी भिडला !
युवराज असुनही त्या दिवासी शंभू एकाकी पडला
कळण्या आधिच आईचा पदर सरला !!
धाराऊ दुधाने बाळ शंभू सळसळला ,
शिवाचा फ़र्जन्दच तो , त्यांच्या तोलानेच तयाने भगवा हाती धरला !
एक समयी पाच पाच मोहिमा लढला होता ,
मराठ्यांची ताकत धाखवत शंभूराजा अवघ्या मुलुखाची शान बनला होता !!
रायगडाच्या होळी माळावर उभ्या त्याच्या आबासाहेबाना मनात आठवत ,
मांवळचा हा वाघ लढत होता !
औरंग्याची गुर्मी उतरवत ,
शिवाचा शंभू सारी हिरवी धगड़ फोडत होता !!
गनोजी सिर्क्याच्या बैमान हातान स्वकीयांनीच त्याचा घाट रचला होता,
पैश्यापाई त्याना हा स्वाभिमानी राजा नको होता !
सर्वाना पुरून उरनारा शंभू राजा म्हनुनच आज शत्रु हाती सापडला होता !!
डोळे फोडले , मीठ चोळले ,
तरी राजा डगमगत नव्हता !
कवडयाच्या माळीवर हात घालणार्‍यावर
त्या आवस्तेतही शंभूराजा भडकला होता !!!
पण भवानीनेच आज गोंधळ घातला होता ,
म्हणूनच की काय तिला हा वीर स्वर्गातच पाहिजे होता !
शिवाने दिलेल्या शपतेपाई शंभूराजा महाराष्ट्र धर्मासाठी बेचाळीस दिवस लढला ,
मरता मरताही भगवा कवटाळत शंभू राजाने ” जगदंब ” म्हणत हिंदवी शब्दच उच्चारला होता……. !!!

रविवार, ३ मे, २०१५

माणसाशी वैर करण्यापूर्वी बुद्ध आठवा...........

माणसाशी वैर करण्यापूर्वी बुद्ध आठवा...........

आज वैशाख बुद्ध पौर्णिमा. जगाला शांततेचा, अहिंसेचा, समतेचा संदेश देणाऱ्या तथागत बुद्धांची जयंती. हा मंगल दिन बौद्धधम्मावर प्रेम आणि आस्था ठेवणाऱ्यांसाठी महापर्व समजला जातो. वैशाख पौर्णिमेलाच बुद्धांचा जन्म, बोधीप्राप्ती आणि महापरिनिब्बाण या तीन महत्त्वपूर्ण घटना घडल्या. जगातील कोणत्याच महापुरुषाचा बाबत अशा घटना घडल्या नाहीत. शाक्यमुनी तथागत बुद्ध जगाला प्रकाश देणारे तेजस्वी सूर्यच...

कपिलवस्तूची महाराणी महामाया देवी आपल्या माहेरी देवदह येथे जात होती. तेथेच नेपाळच्या पायथ्याची वसलेल्या लुम्बिनी वनात तिने ख्रिस्तपूर्व ५६३ साली बाळाला जन्म दिला. बालकाचे नाव 'सिद्धार्थ' ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या वडिलांचे नाव शुद्धोदन होते. सिद्धार्थाच्या जन्मानंतर सात दिवसानंतरच त्याच्या आईचा मृत्यू झाला. सिद्धार्थाची मावशी गौतमीने सिद्धार्थाचे पालनपोषण केले. सिद्धार्थाने गुरू विश्वमित्रापासून वेद आणि उपनिषदाचा अभ्यास केला. राजकाज आणि युद्धविद्याचे धडे घेतले. कुस्ती, घोडेस्वारी, धनुष्यबाण आणि रथ हाकण्यात ते तरबेज झाले. लहानपणापासूनच सिद्धार्थाचे मन करुणेने ओथंबलेले होते. त्याला कोणत्याही प्राण्याचे दुःख, वेदना बघवत नव्हत्या.
बोधगया येथील विशाल पिंपळवृक्षाच्या शीतल छायेखाली सिद्धार्थाने घोर तपश्चर्या करून सम्यक सम्बोधी प्राप्त करून घेतली. तो पिंपळवृक्ष आजही आहे. आज ताे 'बोधीवृक्ष' म्हणून ओळखला जाताे. या वृक्षाला वाचविण्यासाठी, वृक्षाच्या परीक्षणासाठी दरवर्षी विदेशातून नामांकित वैज्ञानिक बोधगयेला येतात. वृक्षाची आयुमर्यादा वाढविण्याचे उपाय सांगतात. या बोधीवृक्षाला जागतिक वारसा सूचीमध्ये स्थान मिळाले आहे. सम्राट अशोकाने या वृक्षाची एक शाखा पुत्र महामहिन्द, पुत्री संघमित्ता यांच्यासमवेत श्रीलंकेला पाठविली होती. तेथेही हा वृक्ष आहे. बुद्ध जयंतीला जगभरातील यात्रेकरू या वृक्षाखाली एकत्र येतात आणि 'जयश्री महाबोधी' म्हणत या वृक्षाचा जयजयकार करतात.
४५ वर्षे सारख्या प्रवासाने, कष्टाने तथागतांचे शरीर दुबळे झाले होते. वयानेही ऐंशीचा टप्पा गाठला होता. आराम नावाला नव्हता. ते मगध देशातून कोसलकडे निघाले. वाटेत पावा येथे भिक्खूसंघासह थांबले. तेथे चूंद नावाचा लोहार त्यांचा भक्त होता. त्याने तथागतांना आपल्या घरी जेवण दिले. त्या जेवणाने तथागत आजारी पडले. तशाही अवस्थेत ते पुढे निघाले. नदी पार करून मल्लांच्या आताच्या उत्तर प्रदेशातील कुसीनगर गावी पोहोचले. आपला अंतःकाळ जवळ आलेला पाहून तथागतांनी शिष्यांना जवळ बोलावले. त्याचवेळी सुदत्त नावाच्या ब्राह्मणाला तथागतांचा उपदेश ऐकावयाचा होता. 'मी शेवटचा श्वास घेईपर्यंत लोकांना खरा धम्म सांगत राहील' असे उद्गार काढून तथागतांनी त्याला धम्मोपदेश केला. तोच बुद्धांचा अखेरचा शिष्य. वैशाख पौर्णिमेलाच रात्रीच्या तिसऱ्या प्रहरी तथागतांचे महापरिनिब्बाण झाले.
तथागत बुद्ध अंतिम समयी म्हणाले, 'माझ्या प्रिय शिष्यांनो, मी तुम्हाला सोडून जात आहे म्हणून दुःख करीत बसू नका. ही ज्योत एके दिवशी विझणारच होती. मी तुम्हाला धम्माचा दीप उजळून दिला आहे. त्या दिव्याच्या प्रकाशात तुम्ही आपले कर्तव्य करीत राहा. लोकांची सेवा करा. त्यांना सुखी करा.' हेच त्या महामानवाचे शेवटचे बोल होते. 'चरथ भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय' असा संदेश देणाऱ्या तथागतांनी उजळलेला धम्मदीप आज शेकडो वर्षे झाली तरी प्रकाशवाट दाखवित आहे. जगातील ५० कोटींहून अधिक जनतेला त्याचा प्रकाश मिळत आहे.
बुद्ध जयंतीला बौद्ध विहारे, स्तूप, दर्शनीय स्थळे विद्युत रोशनाईने न्हावून निघतात. बोधीवृक्षाची पूजा केली जाते. बौद्ध उपासक घरोघरी दीप प्रज्वलित करून सुगंधित फुलांनी घर सजवितात. धम्मग्रंथांचा सुबोध पाठ भदन्ताचार्याद्वारा केला जातो. बुद्धमूर्तीसमोर सुगंधित पुष्पे, फळे अर्पण केली जातात. बुद्धाचे हजारो अनुयायी लुम्बिनी, बोधगया, सारनाथ, कुसीनगर आणि आधुनिक सारनाथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपुरातील दीक्षाभूमीच्या दर्शनाला येतात. दिल्ली संग्रहालय या दिवशी तथागत बुद्धांचा पवित्र अस्थीकलश जनतेच्या दर्शनासाठी ठेवतो.
भारतासोबतच नेपाळ, चीन, जपान, तायवान, कोरिया, लाओस, व्हिएतनाम, थायलंड, कंबोडिया, मलेशिया, श्रीलंका, म्यानमार आणि इंडोनेशियात बुद्ध पौर्णिमेचे कार्यक्रम आयोजित केले जातात. पाश्चात्य देशात एकजीव झालेल्या संस्कृतीनुसार, परंपरेनुसार बौद्ध महोत्सवाचे आयोजन केले जाते. श्रीलंका आणि इतर दक्षिण पूर्व आशियाई देशात हा दिवस 'वेसाक' नावाने साजरा केला जातो. भारतात हा दिवस बुद्ध पौर्णिमा, वैशाख पूजा नावाने तर भारताबाहेर हा दिवस विसाख बुवा, सागादाव, फो देन, फॅट डॅन नावानेसुद्धा स्मरण केला जातो.
ब्रह्मदेशात बर्मी महिन्यानुसार कसो नावाच्या महिन्यात पौर्णिमेच्या दिवशी (वैशाख पौर्णिमा) बुद्ध जयंती, बोधिसत्व प्राप्ती दिवस आणि महापरिनिब्बाणच्या रूपात साजरा केला जातो. या दिवशी सकाळी प्रत्येक नगरातील, प्रत्येक गावातील उपासिका नवीन वस्त्र धारण करून कलशात पाणी भरून जांभूळाची ताजी पाने आणि अक्षत पुष्पादीने सजवून जलकुंभ डोक्यावर ठेवून शिस्तबद्ध रांगेने बौद्धविहारात जातात. धम्मगुरूंचा उपदेश श्रवण केल्यानंतर उपासिका पुन्हा जलकुंभ डोक्यावर घेऊन बोधीवृक्षाला श्रद्धापूर्वक परिक्रमा करतात. बोधीवृक्षाला जलार्पण करून बुद्धाची विधीवत पूजाअर्चा करतात. भारतभूमीने बुद्धासारखा महाप्रज्ञावंत जगाला दिला. म्हणूनच आशिया खंडातील अनेक देशातील लोक बुद्धभूमीकडे पाय करून झोपत नाही. दररोज सकाळी उठल्याबरोबर तथागतांचे स्मरण करून त्यांना त्रिवार वंदन करतात. तथागतांचा महान उपदेश सर्वांसाठी नेहमीसाठीच असतो. गरीब, श्रीमंत, पापी, पुण्यवान सर्वांना उमजेल असा साधा सोपा धम्म बुद्धाने सांगितला.
न हि वेरेन वेरानि सम्मन्तीध कुदाचनं ।
अवेरेन हि सम्मन्ति एस धम्मो सनन्तनो ।।
माणसाने माणसाशीच वैर करावे हे पाहून बुद्धांना मनस्वी दुःख होत असे. वैर टाकून सर्वांनी एकमेकांशी प्रेमाने, सौजन्याने, सहानुभूतीने वागण्याचा त्यांनी संदेश दिला. तथागताची ती थोर शिकवण त्यावेळीही लोकांना पटली होती. आजही प्रेरक ठरत आहे.

-मिलिंद मानकर
साभार महाराष्ट्र टाइम्स


गुरुवार, ३० एप्रिल, २०१५

असा साकारला संयुक्त महाराष्ट्र


असा साकारला संयुक्त महाराष्ट्र

स्वतंत्र भारतात मराठी भाषिकांचे राज्य स्थापन करण्यासाठी संयुक्त महाराष्‍ट्र चळवळ उभारली गेली. या चळवळीमुळे 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य आस्तित्वात आले. महाराष्ट्रात मराठी भाषा बोलणारे मुंबई, कोकण, देश, विभर्द, मराठवाडा, खान्देश व अजूनही महाराष्ट्रबाहेरच असेलेले डांग, बेळगाव, निपाणी, कारवार व बिदर हे भाग अभिप्रोत होते. साहित्यिक, सांस्कृतिक, वैचारिक, राजकीय या सर्व अंगांनी ही चळवळ उभी राहिली. ब्रिटीशांनी आपल्या राज्य कारभारासाठी भारताची विभागणी वेगवेगळ्या प्रांतात केली होती, परंतु ती भाषेप्रमाणे नव्हती. 1920 मध्ये नागपुरात झालेल्या काँग्रेस अधिवेशनावेळी भाषावार प्रांतरचनेचा मुद्दा महात्मा गांधी यांनी मान्य केला होत. लोकमान्य टिळक हे देखील भाषावार प्रांतरचनेच्या बाजूने होते. काँग्रेसनेच एकेकाळी मान्य केलेला हा मुद्दा स्वातंत्र्यानंतर मात्र पक्षाला, विशेषत: पंडित नेहरु संकुचित व राष्ट्रीय एकात्मतेला धोकादायक वाटू लागला. मुंबईतील भांडवलदारांना जे मुख्यत: अमहाराष्ट्रीय होते, त्यांचा मुंबई महाराष्ट्राला द्यायला कडाडून विरोध होता. 

धनंजय गाडगीळ यांच्यासह इतरांनी आयोगासमोर आपली बाजू मांडली. 1955मध्ये आयोगाचा निवाडा जाहीर झाला. पुनर्रचनेबाबत पायाभूत व सगळ्यांना सारखी लागू केलली नव्हती आणि त्यात मोठी विसंगती होती. हैद्राबादासाठी एकभाषिकाचे तर मुंबईसाठी द्वैभाषिकाचे. मुंबई प्रांतात गुजराती भाषिक सौराष्ट्र समाविष्ट करून मराठी भाषिक विदर्भ, बेळगाव, कारवार बाहेर ठेवले गेले. मुंबईच्या विकासासाठी तिला गुजरातपासून वेगळ ठेवणे योग्य नाही व बेळगाव भाग कर्नाटकशी ' आर्थिकदृष्ट्या' जोडला असल्याचे तसेच विदर्भ महाराष्ट्रात घातल्यास नागपूर शहराचे महत्त कमी होईल, असे अहवालात नमूद करण्यात आले. आयोगाला या द्वैभाषिकात मराठी भाषिकांची संख्या गजुराती भाषिकांपेक्षा जास्त होऊ द्याची नव्हती, असेच या विसंगतीचे कारण म्हणावे लागेल.
संयुक्त महाराष्ट्र चळवळ साठी प्रतिमा परिणामसंयुक्त महाराष्ट्र चळवळ साठी प्रतिमा परिणामसंयुक्त महाराष्ट्र चळवळ साठी प्रतिमा परिणाम
या आयोगाच्या विरोधात महाराष्ट्रभर असंतोषाचा डोंब उसळला. नेहरुंनी त्यामुळे सौराष्ट्रासह गुजरात, विदर्भासह महाराष्ट्र व स्वतंत्र मुंबई अशी त्रिराज्य योजना जाहीर केली. त्रिराज्य योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यामुळे अन्यायाची भावना मराठीजनांत पसरली व संयुक्त महाराष्ट्र चळवळीने पेट घेतला. 'मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालच पाहिजे', हे आंदोलनाचे घोषवाक्य बनले. महाराष्ट्रीय काँग्रेस नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वासमोर गुडघे टेकले. यामुळे काँग्रेसनेते जनतेच्या नजरेतून उतरले. महाराष्ट्रातील कम्युनिस्ट, सोशालिस्ट व प्रजा समाजवादी पक्षातील डावे पुढारी व काँग्रेसतरंनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा हातात घेतला. सेनापती बापट, एस.एम.जोशी, आचार्य अत्रे, कॉ. श्रीपाद डांगे, शाहीर अमरशेख, प्रबोधनकार ठाकरे हे चळवळीतील महत्वाचे नेते ठरले.

एस.एण.जोशी, डांगे यांनी लढ्याचे नेतृत्व केले. अत्रे यांनी आपल्या 'मराठा' या दैनिकातून संयुक्त महाराष्ट्राचा जोरदार पुरस्कार केला आणि विरोधकांवर कठोर व बोचरी टीका केली. त्यांनी आपल्या भाषणांतून संयुक्त महाराष्ट्राला विरोध करणार्‍यांचा खरपूस समाचार घेतला. शाहीर अमरशेख, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर गव्हाणकर यांनी आपल्या कलाविष्काराने मराठी अस्मिता जागृत ठेवली.

20 नोव्हेंबर, 1955 रोजी मोरारजी देसाई व स.का. पाटील या काँग्रेस नेत्यांनी चौपाटीवर सभा घेऊन प्रक्षोभक विधाने केली. पाटील यांनी 'पाच हजार वर्षांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही' तर मोरारजी देसाई यांनी 'काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही तसेच गुंडगिरीला योग्य जबाब मिळेल', अशी विधाने केली. लोकांनी संतापून सभा उधळली. 21 नोव्हेंबर, 1955 रोजी झालेल्या आंदोलनावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारामध्ये 15 जणांना प्राण गमवावा लागला. जानेवरी-फेब्रुवारी 1956 मध्ये केंद्रशासित मुंबईची घोषणा केल्यानंतर लोक रस्त्यावर उतरले. हरताळ, सत्याग्रह व मोर्चे सुरू झाले. मोरारजींच्या सरकारने सत्तेचा दुरूपयोग करून निष्ठूरपणे 80 लोकांना गोळीबारात मारले. संयुक्त महाराष्ट्रातील आंदोलनात एकूण 105 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांच्या स्मरणार्थ मुंबईच्या फ्लोरा फाऊंटन भागात हुतात्मा स्मारक उभारले गेले. संयुक्त महाराष्ट्र सुरक्षा रक्षकांसोबत फिरावे लागे व त्यांचे स्वागत काळ्या झेंड्यांनी व निषेधानेच होई. भारताचे अर्थमंत्री सी.डी. देशमुख यांनी महाराष्ट्रावर होणार्‍या अन्यायाच्या निषेधार्थ आपला राजीनामा दिला. या राजीनाम्यामुळे चळवळीला अधिक बळ मिळाले.

संयुक्त महाराष्ट्राची स्थापन
1 नोव्हेंबर, 1956 रोजी केंद्राने सौराष्ट्र, गुजरात, मराठवाडा, विदर्भ व मुंबई इलाख्यातील सर्व मराठी प्रदेश मिळून (परंतु बेळगाव-कारवार वगळून) विशाल द्विभाषिक स्थापले. परंतु या द्विभाषिकाला महाराष्ट्र व गुजरात येथेही कडाडून विरोध झाला. 1957च्या सार्वत्रिक निवडणुकीत समितीला भरघोस यश मिळाले. काँग्रेसचे नेतृत्व या सर्व प्रकारामुळे व 1962ला होणार्‍या निवडणुकीला सामोरे जायचे असल्यामुळे संयुक्त महाराष्ट्राला अनुकूल झाले. ‍इंदिरा गांधी यांनी नेहरू यांचे मन वळविले. द्विभाषिकाची विभागणी करताना महाराष्ट्र राज्याने गुजरातला दहा कोटी द्यायचे व पुढील चार वर्षात ती रक्कम कमी करत आणायची, अशी अट मान्य झाली. तसेच मुंबईचा विकास आणि उभारणी गुजराती भांडवलदारांनी केली, असा दावा गुजराती भाषिक करीत होते. त्याचे 'व्याज' म्हणून एकूण 50 कोटी देऊनच मुंबई महाराष्ट्राला मिळाली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर व डांगचा समावेश झाला नाही. बेळगावाबाबतचा महाराष्ट्र -कर्नाटक सीमाप्रश्न आजही चालू आहे. नेहरूंना राज्याला हवे असलेले 'मुंबई' हे नाव वगळून समितीने 'महाराष्ट्र' असे नाव ठरविले व राज्याची स्थापना कामगार दिनास म्हणजे 1 मे रोजी केली गेली. महाराष्ट्र स्थापनेचा कलश पहिले मुख्‍यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणला गेला. नव्या राज्याची राजधानी मुंबई तर उपराजधानी नागपूर निश्चित झाली.
('निर्मिक'च्या दिवाळी अंकातून साभार)

गुरुवार, २३ एप्रिल, २०१५

देवाकडे राजा मागणारे बेडूक


बेडूक साठी प्रतिमा परिणाम

देवाकडे राजा मागणारे बेडूक

एका मोठया तळ्यातल्या सगळ्या बेडकांनी, एके ठिकाणी जमून विचार केला की, आपण जिकडेतिकडे फिरतो, मनास वाटेल तसे वागतो, हे बरे नाही. आपणावर देखरेख करणारा कोणी तरी धनी असाव, म्हणजे त्याच्या भयाने आपण आपापल्या मर्यादेने राहू. नंतर त्यांनी, आपणास एक राजा दयावा, अशी देवाची प्रार्थना केली, ती ऐकून देवास हसू आले, आणि ‘हा घ्या राजा’ असे म्हणून, त्याने आकाशातून एक लाकूड टाकले. ते पाण्यावर आदळताच मोठा आवाज होऊन तळ्यातले पाणी उसळले, ते पाहून बेडूक भ्याले आणि लाकडापासून दूर उभे राहिले. थोडया वेळाने तळ्यातले पाणी शांत झाल्यावर, त्या लाकडाची हालचाल बंद झालेली पाहून, सगळे बेदूक हळूहळू त्याच्या जवळ गेले. त्याजवर चढून बसले आणि त्याच्याशी खेळू लागले. मग त्यांस असे वाटले की, हा राजा काही कामाचा नाही, देवाकडे दुसरा चांगला राजा मागावा. नंतर त्यांनी पुनः प्रार्थना केली. तेव्हा देवाने त्यांजकडे एक मोठा बगळा पाठविला. त्याने बेडकास खाण्याचा सपाटा चालविला, ते पाहून उरलेले बेडूक भिऊन गेले. मग त्यांनी पुन; देवाची प्रार्थाना केली की, ‘दुसरा कोणी तरी चांगला राजा पाठवावा, नाहीतर पूर्वीप्रमाणे राजावाचूनच राहू दयावे !’ ही प्रर्थाना ऐकून देव म्हणाला, ‘तुमचे मी आता काही ऐकणार नाही. मी पहिल्याने जो राजा दिला होता, तो तुम्हास आवडला नाही, तर आता तुमचे कर्म तुम्हीच भोगा !’

तात्पर्य:- ईश्वर आपणास ज्या स्थितीत ठेवतो तिचा अनादार करून दुसऱ्या स्थितीची इच्छा करू नये. तसेच, मागणे मागावयाचे ते विचारपूर्वक मागावे.

रविवार, १२ एप्रिल, २०१५

कोल्हा रानमांजर आणि ससा

 कोल्हा रानमांजर आणि ससा

 एक लहानसा भित्राससा एका बिळात राहात असे; त्याने एके दिवशी, कोल्हा आपणास धरून मारून खाण्यासाठी बिळाच्या तोंडावर टपून बसला आहे असे पाहिले. परंतु बिळाचे तोंड लहान असल्यामुळे त्यातून कोल्ह्यास आत येणार नाही, हे पाहून, सशाचे भय थोडेसे कमी झाले. पुढे एके दिवशी, कोल्हा एका रानमांजराबरोबर मोठया सलगीने बोलत बसला आहे, असे त्याच्या दृष्टीस पडले. हे चिन्ह काही बरे नाही, असे त्यास वाटले. थोडया वेळाने, ते रानमांजर सशाच्या बिळात शिरले आणि त्यास आपल्या पंजांनी असे ओरबाडू लागले की, सशास आपला जीव वांचविण्यासाठी बिळातून बाहेर पडावे लागले! तो तेथे कोल्हा बसलाच होता, त्याने त्याजवर झडप घालून त्यास पकडले व रानमांजरासह त्याच्या मांसावर ताव मारण्यास सुरवात केली. मरतेवेळी ससा म्हणाला, `तुम्हा दोघा लुच्चांची मैत्री झाली असे जेव्हा मी पाहिले, तेव्हाच आपली आता धडगत नाही, अशी माझी खात्री होऊन चुकली होती.'

तात्पर्य :- एकमेकांशी शत्रुत्व करणाऱ्या दोन मनुष्यांची मैत्री झाली, की एखादया गरीबावर धाड आलीच म्हणून समजावे.